मुंबई - कोरोना विषाणूशी लढाई सुरू असतानाच मुंबईत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल्यानंतर पालिका आपत्कालीन विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. आज एकाच दिवशी सुमारे ७० कावळे आणि कबुतर मृत झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
आवाहनानंतर तक्रारी वाढल्या -
रस्त्यावर कोणताही पक्षी मरून पडला असेल तर त्याला हात लावू नये. असा पक्षी आढळल्यास पालिकेच्या आपत्कालीन १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. मुंबईकरांकडून यानंतर आता तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. आज दिवसभरात कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरात कावळे आणि कबुतर असे एकूण ७० पक्षी मृत आढळून आल्याच्या तक्रारी हेल्पलाईनवर आल्या आहेत. सर्वाधिक ६५ कावळ्यांचा, तर ५ कबुतरांबाबत तक्रारी होत्या. मनपा घनकचरा विभाग आणि राज्य पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मृत पक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
हेल्पलाईन क्रमांक -बारामती : पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि महानगर पालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मनपा हद्दीत पक्षांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींच्या निवारणासाठी आप्तकालीन विभाग, संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयात अथवा वॉररूममार्फत कार्यवाही केली जाईल.