मुंबई- कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही, आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या सेवा जलद हव्या
आम्ही आपत्तीला संधीमध्ये बदलवीत आहोत. गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहचवणे आमचे उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळे पसरविणे सुरू असले तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावे व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल जोडणी पोहचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात-लवकर कशी मिळेल ते पाहावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गावो-गावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी, म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मांडले.