मुंबई :शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प 9 मार्चला सादर होतो आहे. ज्यांनी पाच वर्ष या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री आहेत. ते आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहे साहजिकच या राज्यातील व्यापार, कृषी, उद्योग सर्वांच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प जनतेचा जनतेच्या अपेक्षांचा भंग करणार नाही, अशी आशा असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटले आहे.
उद्योगांसाठी सकारात्मक भूमिका घ्यावी :अर्थसंकल्पाकडून अपेक्षा व्यक्त करताना गांधी म्हणाले की, राज्य नेहमीच पहिल्या क्रमांकावर उद्योगाच्या बाबतीत होतं त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचायला हवं त्यासाठी सरकारने उद्योगाबाबत उद्योग येण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. राज्याने नुकताच मैत्री हा कायदा केलेला आहे त्यामुळे उद्योग स्नेही धोरण जपलं जाईल अशी अपेक्षा आम्हाला या अर्थसंकल्पाकडून आहे. राज्यातील व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण उद्योजकांना बळ देण्यासाठी सरकारने काहीतरी योजना आणावी अशी आपली मागणी आहे.
राज्याचा सर्वांगीण विकास :ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार योजनेची मर्यादा वाढवण्यात यावी. व्यवसाय कर राज्यात अनेक वर्षांपासून चालू आहे. मात्र जीएसटी आल्यानंतर तो कर रद्द होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र तो अद्याप रद्द झालेला नाही त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये तरतूद व्हायला हवी, राज्यातील सकारात्मक रचना जगापुढे जावी अशा पद्धतीने धोरण या अर्थसंकल्पातून यावे, अशी मागणी देखील गांधी यांनी केली आहे. राज्यात पायाभूत सुविधांचा विकास करताना रस्ते रेल्वे वाहतूक सेवा विमान सेवा यावर अधिक भर द्यायला हवा. नवीन विमानतळांमध्ये सरकारने गुंतवणूक करावी तसेच हे राज्य शेती शेतीला पूरक व्यवसाय उद्योग आणि व्यापार या दृष्टीने धोरणामुळे त्यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी अपेक्षाही गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.