लातूर - महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काल (सोमवारी) मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. २०१४ च्या निवडणुकांनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातुरला भाजपने सुरूंग लावला. सबंध जिल्हा भाजपमय होण्याच्या उंबरट्यावर होता. बालेकिल्ल्यातील गड असलेल्या लातूर शहर मतदार संघाबद्दलही साशंका निर्माण झाली होती. मात्र, राजकारणात पुढे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात पूर्वस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांना हे मंत्री पद देण्यात आले आहे.
काँग्रेसला मिळाले लातुरात गतवैभव हेेही वाचा-वाद घालणे अन् भिंती रंगवण्याचे काम आम्हाला राहिले नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतील अंतर्गत मतभेद आणि दुसरीकडे आघाडीतील ऐकी यामुळे जिल्ह्याचे चित्रच बदलले. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी ४ जागा महाविकास आघाडीकडे तर दोन मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. यातच जिल्ह्यात पूर्वस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने देशमुख यांना मंत्रीपद दिल्याचे समजते. विलासराव देशमुख यांचे निधन आणि २०१४ निवडणुकांमधील मोदी लाट यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली होती. तीन विधानसभा मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावस्तरावर भाजप वाढत असल्याने संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचे पक्षाचे स्वप्न सत्यात उतरते की, काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकीट वाटपावरून अनेकांची झालेली नाराजी आणि अंतर्गत कुरघुड्या ह्या पक्षाला चांगल्याच भोवल्या.
त्यामुळे उदगीर, अहमदपूरसारखे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात गेले तर सत्ता समीकरणे बदलताच लातूर महानगरपालिकाही भाजपच्या हातून गेली आहे. आता अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. तर राज्य मंत्रीपदी उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करण्यासाठी आघाडीतील दोन्ही पक्षांनी खेळी केली असून दिवसेंदिवस भाजपचे महत्व कमी होऊ लागले आहे. अमित देशमुख यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागल्यामुळे लातूर शहर, लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील चित्र बदलणार असल्याचे चिन्हे आहेत. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी आहेत. महानगरपालिकेत जसा बदल झाला तसाच बदल जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा काँग्रेसचा मानस राहणार आहे. एकंदरीत गेल्या पाच वर्षात मिळालेले वैभव भाजपला व्यवस्थित जोपासता आले नाही तर आघाडीतील ऐकी आणि राज्यस्तरावर झालेली राजकीय समीकरणे यामुळे पाच वर्षातच काँग्रेसने जिल्ह्यात गतवैभव मिळवले हे खरे.