जालना -राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. तसेच सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी डेटा उपलब्ध न करून दिल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण सुद्धा रद्द झाले, असा आरोप करत भाजपकडून शनिवारी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता औरंगाबाद-जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -शुक्रवारपासून पुन्हा धावणार जनशताब्दी एक्सप्रेस
राज्यातील महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजचे आरक्षण व इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप पक्षाने केला असून राज्य सरकारच्या विरोधात २६ जून रोजी राज्यभर चक्क जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या आदेशानुसार बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद-जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर येथे ११ वाजता चक्क जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन तब्बल एक तास चालल्याने बदनापूरपासून औरंगाबाद व जालना महामार्ग रस्त्यावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या निगराणीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात आमदार नारायण कुचे, प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव जगताप, जिल्हा सरचिटणीस अनिल कोलते पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन घेतले व आंदोलनाची सांगता करण्यात आली.