जळगाव -शहरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे कराराची मुदत संपली आहे. परंतु शासनाचे धोरण ठरत नसल्याने पुढील दिशा अद्याप निश्चित होत नाही. या संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्यात आले असता, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्याची त्यांच्याकडे मागणी केली.
गाळ्यांचा करार संपुष्टात -
जळगाव महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या मालकीच्या गाळ्यांचा करार संपुष्टात आला असून मनपाने गाळे ताब्यात घेत लिलाव करण्याची भूमिका घेतली आहे. जळगाव शहरासह राज्यातील लाखो कुटुंबांचा संसार याच व्यापारी गाळ्यांवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर कोणतेही ठोस धोरण निश्चित केले जात नसल्याने आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. गाळेधारकांवर अन्याय होऊ नये, यासाठी महाआघाडी सरकारच्या काळात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली.