जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था तसेच विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळांतील १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतविण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सव्वालाख विद्यार्थ्यांचा काढणार अपघात विमा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था तसेच विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळांतील १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचा अपघात विमा उतविण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध अर्थसहाय्याच्या योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना २ लाख ४० हजार रूपये व कुलगुरु वैद्यकीय निधी योजनेतून १० हजार रूपये आर्थिक मदत केली जात होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये व कुलगुरु वैद्यकीय निधी योजनेतून १० हजार रूपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
याबाबत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. दि न्यु इंडिया इन्शुरन्सचे विभागीय व्यवस्थापक एस.डी. कमलाकर, सहाय्यक प्रबंधक पंकज सोनी, एजंट प्रल्हाद पाटील यांना विमा उतरविण्यासाठीच्या हप्त्याची रक्कम २४ लाख ९७ हजार रूपयांचा धनादेश कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कुलसचिव भ. भा. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सत्यजित साळवे, सहायक कुलसचिव, एन. जी. पाटील आदी उपस्थित होते.