औरंगाबाद - नाशिकच्या ऑक्सिजन दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि वैद्यकीय अधिष्ठाता कानन येळीकर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटची पाहणी केली. घाटी रुग्णालयात याअगोदर 15 क्यूबिक लिटर ऑक्सिजन क्षमता असणारे टॅंक बसवण्यात आले होते. आता आणखी दोन टॅंक बसवण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जातील, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही. तसेच या ऑक्सिजन टँकवर दोन टेक्निशियन कायम हजर असतात, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
अशी राबवली जाते प्रक्रिया -
टँकर आणि लिक्विड ऑक्सिजन टॅंक यांच्यात एक होस पाईप लावला जातो. त्यानंतर टँकरमधून टॅंकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. हे भरत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या केवळ टॉप सिलिंग वॉलमधून ऑक्सिजन भरले तर प्रेशर कमी होण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी रुग्णांपर्यंत होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये प्रेशर असते त्यामुळे वॉल वेगाने उघडला गेला तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. टँकरद्वारे ऑक्सिजन भरत असताना त्याचा प्रेशर योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन टँकला एक टॉप सिलिंग वॉल असतो आणि दुसरा बॉटम सिलिंग वॉल असतो. टॉप सिलिंग वॉलमधून ऑक्सिजन भरताना टँकरचे प्रेशर कमी होते. तर, बॉटम म्हणून भरताना प्रेशर वाढते, त्यामुळे दोघांचा समतोल राखून ऑक्सिजन भरावे लागते. टॅंकमध्ये ऑक्सिजन भरून झाल्यावर वेपराईजपर्यंत पोहोचते. तिथून ऑक्सिजन गॅस तयार होतो. त्यानंतर रेग्युलेटर व प्रेशर नियंत्रित करून ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांपर्यंत केला जातो.