औरंगाबाद -भिशीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना औरंगाबादेत उघडकीस आली. गोविंद कुरीज या कंपनीने छोट्या व्यावसायिकांची शासनमान्य भिशी असल्याचा बनाव करत ही फसवणूक केली आहे. यामध्ये ४०० हून अधिक छोट्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
भगीरथ बजाज या भामट्याने औरंगाबदमधे आलिशान ऑफिस थाटून 'छोटी बचत'च्या माध्यमातून भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला. गोविंद कुरीज नावाने सुरू केलेल्या या भिशीत सुरुवातीला चांगला परतावा त्याने दिला. लोकांचा विश्वास संपादन करून या भामट्याने जवळपास १० ते २० कोटींचा गंडा घालून पळ काढला.
औरंगाबादच्या गरखेडा येथे भगीरथ बजाज या भामट्याने भिशी चालवण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. सरकारमान्य भिशी असल्याची बतावणी बजाज याने केली. या भिशीत त्याने छोट्या व्यावसायिकांना लक्ष करत वेगवेगळी आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक कारायला लावली. सुरुवातीला भिशीच्या माध्यमातून व्यावसायिकांना फायदा झाला. अनेक व्यावसायिकांनी रोजची कमाई बचत म्हणून गोविंदा कुरीजमध्ये जमा करायला सुरुवात केली. पैसे जमा करण्यासाठी भगीरथ बजाज यांचा कर्मचारी रोज कलेक्शनसाठी जाऊ लागला. पैसे जमा करताना सर्व ठेवीदारांना पासबुक देखील देण्यात आले होते.