औरंगाबाद -सातारा परिसरात झालेल्या बहीण-भावाच्या हत्येचा तपास पूर्ण करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठीच चुलत भाऊ आणि मेव्हण्याने दोघांची हत्या करून सोन चोरले, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
सातारा परिसरात राहणाऱ्या किरण आणि सौरभ खंदाडे या बहीण भावाची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. या घटनेचा तपास करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी चार पथक तयार करून आरोपींचा शोध लावला. हत्येप्रकरणी सतीश खंदाडे आणि अर्जुन राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून काही प्रमाणात सोनेही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
आरोपी सतीश खंदाडे हा मृत किरण आणि सौरभ यांचा चुलत भाऊ लागतो. तर दुसरा आरोपी अर्जुन राजपूत हा आरोपी सतिषचा सख्खा मेव्हणा आहे. हे दोघेही आरोपी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांना सोमवारी खंदाडे किरण आणि सौरभ यांना औरंगाबादच्या घरी ठेऊन बाकी कुटुंबीय जालन्याला आल्याची माहिती मिळाली. दोघांनी सकाळी जालना येथून तीन चाकू विकत घेतले. आणि दुपारच्या सुमारास औरंगाबादला सातारा परिसरातील घर गाठले. यानंतर आरोपींनी किरण आणि सौरभ यांच्यासोबत गप्पा मारत कॅरम खेळण्याचा आनंद लुटला.
यानंतर चहा पिल्यावर किरण वरच्या मजल्यावर अंघोळीसाठी गेली. त्याच वेळी आरोपींनी सौरभला बाथरूम मध्ये नेत त्याचा गळा चिरला. सौरभचा आवाज ऐकून किरण खाली पळत आली. त्यावेळी आरोपींनी किरणचे तोंड दाबून तिचादेखील गळा चिरत तिचीही हत्या केली. हत्येनंतर वरच्या घरात असलेले सोने घेऊन आरोपींनी पळ काढला.