औरंगाबाद- औरंगाबाद महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी 1 हजार 275 कोटी 24 लाख 11 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात 84 लाख 34 हजार रुपयांची वाढ झाली आहे. पहिल्यांदा स्मार्ट सिटीसाठीचा भाग म्हणून 50 कोटींची तर स्वच्छ भारत मिशनसाठी देखील प्रथमच तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा पालिकेच्या निधीतून शहरात शंभर कोटींमधून रस्त्यांची कामे केली जाणार, अशी घोषणा आयुक्त पांडेय यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.
मागील अर्थसंकल्पात लावली होती कात्री
पालिक आयुक्त पांडेय यांनी मागीलवर्षी वास्तववादी अर्थसंकल्प सादर करत असताना 1800 कोटींच्या कामांना कात्री लावली होती. त्यानंतर यावर्षीच्या अर्थसंकल्पात देखील वास्तववादी भूमिका मांडली आहे. अर्थसंकल्प सादर करताना पालिकेचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी प्रारंभी प्रास्ताविक करुन प्रशासकांचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्तांनी बजेटच्या पुस्तकाचे विमोचन केले. विमोचनप्रसंगी त्यांनी पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच स्मार्ट सिटी प्रकल्प व स्वच्छ भारत मिशनसाठी अनुक्रमे 50 व 24 कोटींची तरतूद केली आहे. तसेच पालिकेच्या निधीतून यंदा शहरात शंभर कोटींचे रस्ते तयार केले जातील. त्याची तरतूद देखील यात असल्याचा उल्लेख आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. या निधीतून शहरात केवळ डांबरीकरणाचे रस्ते केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मालमत्ता कर वसूलीसाठी यंदा नवीन पध्दत अंमलात आणली जाणार आहे. चालू वर्षाच्या मालमत्ता कराच्या डिमांड नोट आणि मालमत्ता कराच्या थकबाकीच्या डिमांड नोट वेगवेगळ्या वितरित केल्या जातील, असेही आयुक्त पांडेय यांनी सांगितले आहे.
ह्या आहेत बजेटमधील प्रमुख बाबी
प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, 100 कोटी, गरवारे क्रीडा संकुलात जलतरण तलाव विकसित करणे, अपारंपारिक उर्जा प्रकल्प, 5 कोटी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी ट्रांन्सफर स्टेशन उभारणे, पैठणगेट पार्किंग येथे बहुमजली पार्किंग विकसित करणे, पालिकेच्या मालकीचे पेट्रोल पंप व डिझेल पंप स्थापन करणे, पालिकेच्या विविध उद्यानात मनोरंजन पार्क व साहसी खेळ बीओटीतत्वावर विसकित करणे. शहराच्या सिमेवर प्रवेशव्दार उभारणे. अशी प्रमुख विकास कामे यावर्षीच्या अर्थसंकल्पात नियोजित करण्यात आली आहेत.
औरंगाबाद महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; नवीन वर्षात अनेक कामांना प्राधान्य
पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रथमच स्मार्ट सिटी प्रकल्प व स्वच्छ भारत मिशनसाठी अनुक्रमे 50 व 24 कोटींची तरतूद केली आहे. तसेच पालिकेच्या निधीतून यंदा शहरात शंभर कोटींचे रस्ते तयार केले जातील. त्याची तरतूद देखील यात असल्याचा उल्लेख आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे.
महापालिका अर्थसंकल्प