अमरावती -वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे पश्चिम विदर्भात 21 मार्चपर्यंत सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज शिवाजी विज्ञान केंद्राचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनिल बंड यांनी वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे सक्रिय
कर्नाटक ते पश्चिम मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच मध्य महाराष्ट्रावर 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वातावरणाच्या मधल्या थरात वाहणारे बाष्पयुक्त पश्चिमी वारे आणि खालच्या पातळीवर पूर्वेकडून वाहणारे वारे यांच्या संयोगातून विदर्भात 21 मार्चपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात २४ तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही बंड यांनी वर्तवला.
रब्बी हंगामातील गहू पिकाला फटका
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात जर अवकाळी पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकातील गहू आणि काढणीला आलेल्या हरभरा पिकाला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहणार आहे.