महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2023, 4:17 PM IST

ETV Bharat / state

Cultivated linseed : श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली जवसाची यशस्वी लागवड

अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक एकर शेतीत जवस वनस्पतीचे उत्पादन घेतले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांनी जवस पीकाचे उत्पादन घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होइल असे मत प्राध्यापक आर. के. पाटील यांच्यासह श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

Cultivated linseed
जवसाची यशस्वी लागवड

विद्यार्थ्यांनी केली जवसाची यशस्वी लागवड

अमरावती :जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीस ते चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात जवस तेलाचा वापर केला जायचा. मात्र, महाराष्ट्रातून लोक पावलेले हे पीक पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी समृद्धी घेऊन येऊ शकते. अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात एक एकर जागेवर घेतलेल्या जवसाचे पीक आता दाणे भरण्याच्या अवस्थेत आले आहे. महाविद्यालयाच्या परिसरात यशस्वी झालेला हा प्रयोग पुन्हा एकदा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी जवस पीक आपल्या शेतात घेतले शेतकऱ्याच्या घरात समृद्धी येईल अशी अपेक्षा महाविद्यालातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

औषधी गुणधर्म :जवस हे औषधी गुणधर्म असणारे तेल बियाणे आहे. हे तेल इतर तेलांपेक्षा थोडेसे घट्ट राहते. याची चव थोडीफार कडसर लागते असे, असले तरी या तेलामध्ये मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे औषधी गुणधर्म आहेत. हृदयविकाराच्या रोगापासून बचाव करण्यासाठी जवस हे सर्वात उत्तम आहे. शरीरात ज्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात त्या रक्तवाहिन्यांचे प्रसरण जवसाच्या सेवनामुळे बरे होते. यासह कर्करोगा विरोधात औषधी गुणधर्म जवसमध्ये आढळून आले आहेत.

जवस तेल महाग : पूर्वी लोक जवसाच्या तेलाचा सर्वाधिक वापर करायचे. जवसमध्ये आढळणारा ओमेगा हा घटक हृदयविकार टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वी जवसाचे तेल हे गरिबांचे तेल म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता जवसाचे महत्त्व पटायला लागल्यावर आज जवस तेलाचे भाव पाहता गरिबांना याचा वापर अजिबात परवडणारा नाही अशी परिस्थिती आहे.

जवस महाराषष्ट्रातून हद्दपार : महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक पावलेले जवस पीक सध्या देशात राजस्थानमध्ये काही भागात घेतल्या जाते. जवसा करिता आपल्याकडली जमीन अतिशय उपयुक्त असताना देखील जवस आज महाराषष्ट्रातून हद्दपार होते आहे. महाराष्ट्राला जवस तसेच जवसाचे तेल आयात करावे लागते हे दुर्दैव आहे. मात्र यापुढे जवसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी आंतर पिकाच्या स्वरूपात किंवा मुख्य पिकाच्या स्वरूपात करावे. यासाठी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती केली जाईल असे देखील प्राध्यापक आर. के. पाटील म्हणाले.

विद्यार्थ्यांनी राबवला बीजोत्पादन कार्यक्रम : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्माण केलेले एन. एल. 260 या वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवला आहे. या कार्यक्रमाद्वारे निर्माण होणाऱ्या पायाभूत बिजांचे प्रामाणिक बियाणे शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी याचे आंतरपीक म्हणून जरी उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांचा बराच फायदा होईल. पूर्वी कालबाह्य झालेले जवसाचे पीक पुन्हा पुर्नजीवित करता येईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये असणाऱ्या ओमेगाच्या घटकाचे महत्त्व सर्वांना लक्षात आल्याने आता मोठ्या मॉलमध्ये दोनशे रुपये किलो या दराने मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवस पीक घेतल्यास सामन्याना जवस खरेदी करता येईल असे पाटील यांनी सांगितले. जवसाचे पीक शेतात घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावा असे, प्राध्यापक आर के पाटील यांच्यासह श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा -MLC Election Result : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा डंका, ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details