अमरावती -जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठी झाडे सुध्दा पडल्याची माहिती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकर्यांना अवेळी येणार्या पावसाचा मोठा सामना करावा लागत आहे. प्रत्येक पिकाच्या वेळी शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट ओढावत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात गारपीटसह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्याचा सुध्दा समावेश आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) भागात वादळी वाऱ्यामुळे रामराव सिताराम कुबडे व इतर अनेक शेतकऱ्यांचे गहू अक्षरश: जमिनीवर झोपले. त्यामुळे या भागात गव्हाचे चांगलेच नुकसान झाले आहे. याबाबत पं. स. उपसभापती प्रतिभा डांगे यांनी पाहणी सुध्दा केली. याशिवाय मालखेड परिसरात गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. मालखेड येथील शेतकरी मनोहर गुल्हाने यांच्या संत्रा पिकाचे व मालखेड येथील शेतकरी विजय मारोतराव अंबाडकर यांच्या शेतीतील भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मांजरखेड (कसबा) व बासलापुर भागात संत्रा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.