अमरावती - हमी भावासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले आहे. आता केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड ऐवजी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकणे पसंत केले आहे. यामुळे जिल्ह्यातील नाफेडचे कापूस खरेदी केंद्र 15 फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. नाफेडच्या तुलनेत खाजगी बाजारात कापसाला अधिक भाव मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मात्र, मागील वर्षी याच नाफेडने शेतकऱ्यांना तारले होते.
याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा. खासगी बाजारपेठेत कापसाला 6 हजार रुपये भाव - यावर्षी नाफेडच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला 5 हजार 725 रुपये प्रति क्विंटल हमी भाव दिला जात आहे. मात्र, यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने खासगी बाजारपेठेत कापसाला मागणी वाढली. यामुळे खासगी व्यापारी मात्र 6 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहे. त्यामुळे प्रति क्विंटल दोनशे रुपयांपेक्षा जास्त नफा मिळत असल्याने आणि पैसेही तत्काळ मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील नाफेडचे सर्व कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -'सर्व आरोप बिनबुडाचे; ऑडिओ क्लिपची वैधता कुठेही नाही'
नोव्हेंबर महिन्यात सुरू झाली होती खरेदी -
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने नाफेडची कापूस खरेदी केंद्र सुरू झाले होते. मात्र, आता या केंद्रांवर शून्य आवक नोंदविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, लेहगाव आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नाफेडने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. मात्र, पहिल्या दिवसांपासून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात अतिवृष्टीमुळे कापूस वगळता शेतकऱ्यांची सर्व पिके वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त कापसावर होती. मात्र, हमीभावाच्या नावाखाली अपेक्षेपेक्षा कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना पसंत केले आहे.
आतापर्यंत फक्त पावणे दोन लाख क्विंटल आवक -
अमरावती तालुक्यातील 02, दर्यापूर तालुक्यात 04, मोर्शी 02, वरुड 01, अचलपूर 01, अंजनगाव सुर्जी 08, चांदुर बाजार 01, नांदगाव खंडेश्वर 01 असे कापूस खरेदी केंद्र जिल्ह्यात कार्यरत आहे. 21 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत या केंद्रावर 6 हजार 664 शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. त्यानुसार केवळ पावणे दोन लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आता मात्र, सर्वच केंद्रावर शुन्य आवक नोंदवली गेली आहे.