अमरावती - मजुरी काम करणाऱ्या बापाची मुलगी नायब तहसीलदार झाल्याचा निकाल १९ जून २०२० ला लागला. निकाल समोर येताच अमरावतीच्या अकोली परिसरात राहणाऱ्या बारसे कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदी आनंदाचे वातावरण झाले. मात्र आता वर्ष उलटले तरी सरकारने रुजू होण्याबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. सरकारने आम्हाला रुजू करून लवकरात लवकर आमच्या कामची पोचपावती द्यावी. अशी व्यथा नायब तहसीलदार प्राजक्ता बारसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.
का हो खरंच झाली ना नायब तहसीलदार ?
अमरावती शहरातील अकोली या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या प्राजक्ता बारसे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सलग महिना, दोन महिने गर्दी झाली. मात्र प्राजक्ता कुठे रुजू झाली नाही. ती घरीच दिसते, यामुळे आता अनेक लोक, का हो तुमची मुलगी खरंच नायब तहसीलदार झाली ना ? असे प्रश्न आई-वडिलांना विचारतात. यामुळे त्या दोघांनाही मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. मला सुद्धा अशा प्रश्नांचा त्रास व्हायला लागला आल्याचे प्राजक्ता यांनी सांगितले.
आणखी किती प्रतिक्षा करावी -
आता नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती होऊन वर्ष उलटले आहे. सुरूवातीला कोरोनामुळे आम्हाला रुजू करण्यास उशीर झाला. हे कारण आम्ही समजू शकलो. मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाच्या वादात आमच्या रुजू होण्याचा विषय अडकला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मात्र आम्हाला रुजू करून घेतील असे वाटत होते. मात्र तशा कुठल्याही हालचाली दिसत नसल्याबाबत प्राजक्ताने खंत व्यक्त केली.