अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण सध्या दाखल असून या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या वावरामुळे रुग्णालय डॉक्टर, नर्सेस यांना नियमित काम करणे अवघड झाले आहे. चिंतेची बाब म्हणजे नातेवाईक थेट आयसीयू मध्ये येत आमच्या रुग्णाला रेमेडिसीवर द्या, हे औषध का नाही दिले, रुग्ण दगावला तर तुमची तक्रार करू असा दबाव आणतात. त्यामुळे रुग्णालय कर्मचारी सध्या वैतागले आहेत.
जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन रुग्ण नातेवाईकांच्या गर्दीमुळे वैतागले नातेवाईक बनताहेत कोरोना सुपर स्प्रेडर
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील सर्व रुग्ण दाखल होतात. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची संख्या पुरेशी असल्याने अनेक रुग्ण याठिकाणी सध्या दाखल आहेत. मात्र एका रुग्णासोबत चार-पाच नातेवाईक देखभालीसाठी सोबत येतात. हे नातेवाईक पुरेशी काळजी न घेता रुग्णांसोबत थांबतात. रुग्णाकडे लक्ष द्यायचे आहे, असे कारण देत थांबलेल्या नातेवाईकांची गर्दी, कोरोना सुपर स्प्रेडर बनत असल्याचे तज्ञाचे मत असून, त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याचे समोर येत आहे.
रुग्णांवर उपचार करावे का नातेवाईकांशी वाद घालावा?
अनेक नातेवाईक ऐकण्याच्या मानसिकतेत नसतात. कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनाही ते जुमानत नाहीत. या नातेवाईकांच्या अनावश्यक गर्दीमुळे रुग्णांवर व्यवस्थित उपचार करणे अवघड होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर्स, नर्सेस सांगत आहे. यावर उपाय करणे आता गरजेचे बनले असून, पोलिसांची मदत घेऊन यावर आळा घातला गेला पाहिजे. अन्यथा कोरोना रुग्णांच्या भेटीला येणारे नागरिकच बाधित होऊन सुपर स्प्रेडरचे काम करणार आहेत. कडक लॉकडाऊन असतानाही रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतांनाच दिसणार आहे.
जिल्हा रुग्णालयाचे अनेक कर्मचारी बाधित
जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रभावात जिल्हा रुग्णालयही सापडले असून, आतापर्यंत निम्मे कर्मचारी बाधित झाले आहेत. चार कर्मचारी आतापर्यंत यात मृत्यू पावले आहेत. दर दिवशी पाच ते दहा कर्मचारी-डॉक्टर बाधित होत असतात, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी दिली आहे.
हेही वाचा -'प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले?' रोखठोकमधून संजय राऊतांचे परखड विश्लेषण