मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या पराभवाचा जबाबदार ठरलं आहे. या दरम्यान भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितलं आहे.
सचिनने न्यूझीलंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरल्यानंतर ट्विट केलं आहे. त्यात त्याने न्यूझीलंडच्या संघाचे अभिनंदन केलं आहे. तो पुढे लिहतो की, भारतीय संघ आपल्या कामगिरी नक्कीच निराश होईल. मी आधीच सांगितलं होतं की, सहाव्या दिवसाच्या खेळातील पहिले १० षटके खूप महत्वाची ठरणार आहे. भारताने पहिल्या १० चेंडूतच विराट कोहली आणि पुजारा यांना गमावलं. यामुळे भारतीय संघावर दबाव आला.
सचिनचे ट्विट पाहता, त्याच्या मते, विराट किंवा पुजारा याच्यापैकी एकाने जर काही वेळ खेळपट्टीवर घालवला असता तर भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं नसतं. दरम्यान, सहाव्या दिवशी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन याने विराट कोहलीला ३५व्या षटकात तर चेतेश्वर पुजाराला ३७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद करत भारतीय संघाला पराभवाच्या खाईत ढकललं. न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं. ते गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर सरस ठरल्याची कबुली माजी खेळाडूंनी दिली.