महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 21, 2023, 7:07 AM IST

ETV Bharat / sports

Harmanpreet Kaur Record : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! बनली 150 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली खेळाडू!

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयर्लंडविरुद्ध दोन मोठे विक्रम केले. या सामन्याद्वारे हरमनप्रीत कौरने 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 3000 धावा पूर्ण करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Harmanpreet Kaur
हरमनप्रीत कौर

नवी दिल्ली : टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयर्लंडविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक सामन्यात अवघ्या 13 धावा केल्या. मात्र या दरम्यान तिने दोन मोठे विक्रम आपल्या नावे केले. या सामन्यात खेळायला उतरताच हरमनप्रीत कौरने एक मोठी कामगिरी केली, जी महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत कोणीही करू शकलेले नाही. हरमनप्रीत कौर ही 150 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली (महिला आणि पुरुष) खेळाडू ठरली आहे.

रोहित शर्माला मागे टाकले : हरमनप्रीत कौर ही टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिली खेळाडू ठरली आहे, जिने 150 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या बाबतीत तिने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहितने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 148 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने 11 जून 2009 रोजी इंग्लंडविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

टी 20 मध्ये 3000 धावा पूर्ण : हरमनप्रीत कौरने या सामन्यात आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात तिने 7 धावा करताच ही कामगिरी केली. हा पराक्रम करणारी ती भारताची पहिली तर जगातील चौथी महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतच्या आधी हा पराक्रम न्यूझीलंडच्या सुजी बेट्स, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि वेस्ट इंडिजच्या स्टॅफनी टेलरने केला आहे. या शिवाय हरमनप्रीत कौरने भारतासाठी 3 कसोटी आणि 124 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 20 चेंडूत 13 धावांची खेळी केली.

महिला टी 20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 3000 धावा करणाऱ्या टॉप 5 खेळाडू :

  1. सुझी बेट्स, न्यूझीलंड, 3820 धावा
  2. मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलिया, 3346 धावा
  3. स्टॅफनी टेलर, वेस्ट इंडिज, 3166 धावा
  4. हरमनप्रीत कौर, भारत, 3006 धावा
  5. सोफी डिव्हाईन, न्यूझीलंड, 2969 धावा

भारताचा आयर्लंड विरुद्ध विजय : महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत काल भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडचा 5 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंडच्या फलंदाजी दरम्यान 8.2 षटकानंतर पाऊस पडला. या नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. भारताकडून सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने धडाकेबाज खेळी केली. तिने अवघ्या 56 चेंडूत 87 धावा केल्या.

हेही वाचा :Virat Kohli Food : कोहलीला आहे कारल्याचा तिटकारा! तर 'हा' आहे त्याचा आवडता पदार्थ

ABOUT THE AUTHOR

...view details