मुंबई -संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच यूएईत आयपीएलचा तेरावा हंगाम यशस्वीरित्या पार पडला. आता आयपीएलच्या चौदाव्या हंगामाकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहे. बीसीसीआयनेही नव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतात केले जाईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले होते. शिवाय एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार चौदाव्या हंगामात १० संघ सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, तसे होऊ शकणार नसल्याची चर्चा समोर आली आहे.
हेही वाचा -बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक
आठ संघ का?
नव्या हंगामात संघांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. १० संघांचा समावेश झाल्यास, अडीच महिन्यांच्या कालावधीत ९४ सामने खेळवताना आंतरराष्ट्रीय वेळापत्रक बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे नियमितपणे आठ संघांतच हा हंगाम खेळवून २०२२च्या हंगामात १० संघांचा समावेश होणार असल्याचे वृत्त आहे. अहमदाबाद येथे २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाईल.
आयपीएलमध्ये नववा आणि दहावा संघ -
याआधी आयपीएलमध्ये नऊ आणि एका हंगामात दहा संघांनी सहभाग नोंदवला होता. २०११ च्या हंगामात दहा संघ तर २०१२ मध्ये ९ संघांनी सहभाग नोंदवला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार गुजरात, अहमदाबाद हे दोन संघ चौदाव्या हंगामात सामील होणार होते.
दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन भारतातच करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याचे संकेत अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत.