IND vs ENG : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव
इंग्लंडच्या महिला संघाने दिला भारताला व्हाईटवॉश
गुवाहाटी - भारतीय महिला संघ आणि इंग्लंडच्या महिलासंघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात इंग्लंडने एका धावेने भारतावर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने ३ सामन्यांची ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करत भारताला व्हाईटवॉश दिला आहे. हा सामना गुवाहाटी येथील बर्सापारा क्रिकेट मैदानावर खेळला गेला.
या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारीत २० षटकात ११९ धावा केल्या. भारताच्या अनुजा पाटील आणि हरलीन देवोल यांनी प्रत्येती २ विकेट्स घेतल्या. भारताच्या गोलंदाजांनी चागंली कामगिरी करत इंग्लंडला कमी धावसंख्येवर रोखले मात्र फलंदाजांच्या हाराकीरीमुळे भारतीय संघास व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले.
इंग्लंडने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेली फलंदाज स्मृती मंधाना (५८) आणि मिताली राजने ३० धावांची चांगली खेळी केली. मात्र ईतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी साकारता न आल्याने भारताचा १ धावेनं पराभव झाला. इंग्लंडसाठी केट क्रॉसने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.