मेलबर्न- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील अखेरचा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे उपांत्य फेरीत कोणते चार संघ आमने-सामने येणार, हे निश्चित झाले आहे. उपांत्य फेरीत आजघडीपर्यंत अजिंक्य असलेल्या भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होईल. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडतील.
आयसीसी महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्य राहून उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी 'अ' गटात ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया या गटातून दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे 'ब' गटात दक्षिण आफ्रिका ७ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. तर इंग्लंड सहा गुणांसह दुसर्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला २०१७ सालच्या पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी आहे. २०१७ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. यात इंग्लंडने भारताचा ९ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले होते. विश्वकरंडकातील त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला आहे.
दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाने सोमवारी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. त्यांच्यासमोर आफ्रिकेचे आव्हान असेल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने चार वेळा विश्वकरंडक जिंकला आहे, तर इंग्लंडने २००९ चा विश्वकरंडक जिंकला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला होणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्याचे वेळापत्रक -
- भारत विरुद्ध इंग्लंड, ५ मार्च, सकाळी ९.३० वाजल्यापासून
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ५ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासून