हैदराबाद - भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी २० सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. यासाठीची तिकीट विक्री सिकंदराबाद जिमखाना मैदानावर गुरुवारी सुरू होती. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे किमान 20 लोक बेशुद्ध झाले आणि अनेक लोक जखमी झाले.
25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी जवळपास 30,000 लोक जमा झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने शहरातील उप्पल स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी जिमखाना मैदानावर तिकीट विक्रीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच नागरिक तिकिटांसाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.
हजारोंच्या संख्येने लोक जमा होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन करणे पोलिसांना कठीण जात होते. मुख्य गेटवरून अचानक लोकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. गर्दीत अडकलेल्या महिलांसह अनेक जण हवेअभावी बेशुद्ध पडले. या झटापटीत अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
गर्दीत असलेल्या अनेक महिला बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे पोलीस अधिकाऱ्यांनी खंडन केले. केवळ चार काउंटर उभारण्यात आल्याने तिकीट विक्रीची व्यवस्था अपुरी असल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.
हेही वाचा -Ind V/S Eng Women Odi : हरमनप्रीत कौरने फक्त 111 चेंडूत कुटल्या 143 धावा, इंग्लंडचा 88 धावांनी पराभव