महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2019, 9:06 PM IST

Updated : Jun 5, 2019, 9:23 PM IST

ETV Bharat / sitara

Bharat Movie Review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा ‘भारत’

Bharat Movie Review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा ‘भारत’

मुंबई- 'जितने सफेद बाल.. मेरे सर और दाढीमें हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है'; असं म्हणत 70 वयाच्या व्यक्तीच्या भूमिकेत असलेल्या सलमान खानच्या एंट्रीला प्रेक्षागृहातून टाळ्या-शिट्ट्या वाजल्याशिवाय राहत नाही. बॉलिवुड दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत ठरलेला ‘भारत’ हा चित्रपट (5 जून) बुधवारी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची 5 वेगवेगळी रुपं प्रेक्षकांना पाहता आली आहेत.

चित्रपटाची कथा 'भारत' या व्यक्तीच्या भोवती फिरताना दिसते. यामध्ये भारतच्या तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. त्याबरोबरच या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट झळकली आहेत. या चित्रपटामध्ये सलमानच्या या संवादाप्रमाणेच लेखक-दिग्दर्शक अली अब्बास ज़फ़र याने सिनेमा तितकाच 'रंगीन' आणि 'रंजक' बनवला आहे. यापूर्वी सलमान खान आणि अली अब्बास जफर या जोडीने 'सुलतान', 'टायगर जिंदा है' सारखे मनोरंजक सिनेमे दिले आहेत. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा अलीने एक दमदार चढउतारांची पटकथा 'भारत' या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्लॅशबॅकमध्ये १९४७ च्या कालखंड रंगवण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये भारताचे विभाजन, त्या काळातील जनतेची परिस्थिती आणि साऱ्यामध्ये भारतचे खुलणारे प्रेम आणि त्याचा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष रंगविण्यात आलायं. चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये भारताचे विभाजन चित्रीत केलंय. यावेळी सलमान खान एका सर्कसमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत असतो. या सर्कसमध्ये तो अनेक साहसदृश्यदेखील करतो. बाहेर देशात सुरू असलेली परिस्थिती आणि भारतच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे.

त्यातच सर्कसी दरम्यान, भारतच्या त्याच्या मैत्रिणीबरोबर (दिशा पटानी) खुलणाऱ्या प्रेमावरही प्रकाश टाकण्यात आलायं. त्यानंतर उत्तरार्धामध्ये १९७० चा काळ दाखवण्यात आला आहे. या उत्तरार्धामध्ये तेल निर्यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुमुद रैनाचा (कतरिना कैफ) प्रवेश होतो. सर्कसमध्ये काम केलेला भारत त्याच्या मित्रासह (सुनील ग्रोव्हर) या तेल निर्यात कंपनीमध्ये कामास रुजू होतो. कधी काळी सर्कसमधील मैत्रिणीवर प्रेम करणारा भारत या नव्या कंपनीत आल्यानंतर कुमुदच्या प्रेमात पडतो आणि येथून चित्रपटाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दोघांचे प्रेम, भारताचे होणारे विभाजन, त्यातच त्याला 5 वेगवेगळी रुप का साकारावी लागतात हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल. त्यामुळे प्रेक्षकांना हे सगळे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावाच लागेल.

या चित्रपटामध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशनल सीन या साऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटामध्ये उत्तमरित्या सेटची उभारणी करण्यात आली आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनला साजेशा गाण्यांचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची रंगत वाढल्याचे दिसून येते. चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी या चित्रपटाला योग्य दिशा दिली आहे. त्यासोबतच चित्रपटातील तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ यांनीदेखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.

Last Updated : Jun 5, 2019, 9:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details