पुणे - शेतकऱ्यांना राजकारण्यांकडून दिलासा हवा आहे. त्यांना फक्त कर्जमाफीच नाही, तर मानसिक आधार आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे वक्तव्य अभिनेते नाना पाटेकर यांनी केले आहे. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समीरण वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
नाना पाटेकर यांनी यावेळी 'शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी' या विषयावर आपले मत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा क्षणी थोडा विचार करायला हवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी भरपाई दिली नाही तरी चालेल पण खांद्यावर हात ठेवा. शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे. फक्त कर्जमाफी नाही. शेतकरी काय भिकारी आहे का? शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत असं कस चालेल. मॉलमध्ये करता का घासाघीस? शेतकऱ्यांकडे भाव करू नका. जर कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडलं. यावर विचार करण्याची गरज आहे, असंही नाना म्हणाले.