ठाणे- मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाला (एसटीएफ) शनिवारी मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी लखनऊमधून गोरखपूरमधील रहिवासी असलेल्या इरफान सोनू शेख मन्सुरी उर्फ राजधनिया या आरोपीला अटक केली आहे. जवळपास पाच महिने तो फरार होता. विभूतीखंड पोलीस ठाणे परिसरातील कठौता तलावाजवळ एसटीएफने इरफानला पकडले. जमील शेख यांच्या हत्येसाठी ठाण्यातील एका नगरसेवकाने दहा लाख रुपयांची सुपारी दिल्याचे इरफानने पोलीस चौकशीत सांगितले आहे.
जमील हे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष होते. 23 नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्येची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. जमील शेख हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन जणांपैकी मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले होते. डोक्याच्या मागे गोळी लागल्याने जमील हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार पाहून तेथे आजूबाजूला असलेले सगळेच हादरले. त्यानंतर तातडीने जमील यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच जमील यांचा मृत्यू झाला होता. जमील अहमद शेख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र पोलीस आरोपीच्या शोधात होते.
आणखी एका आरोपीचा शोध
मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येत सुपारी देणारा नेता अजूनही पुढे आला नाही. कारण सुपारी घेणारा ओसामा नावाचा आरोपी अजूनही पोलिसांना मिळालेला नाही. तो मिळाला तरच पुढील तपास होऊन सुपारी देणाऱ्याचे नाव समोर येणार आहे. या गुह्याच्या तपासासाठी मागील अनेक महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडून बसले आहेत, आता अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन ठाण्यात आणल्यावर आणखी पुढे तपास होणार आहे.
नजीब मुल्ला यांच्या कार्यालयाची तोडफोड