नागपूर - नागपुरात कोरोनाची आतापर्यंतची सर्वाधिक ३ हजार ७९६ एवढी रुग्णसंख्या गेल्या २४ तासात नोंदविल्या गेली आहे. मात्र, तरीही नागरिकांना याचं गांभीर्य नसल्याचं दिसून येतंय. शहरातील कळमना कृषी उत्पन्न बाजारपेठेतील फ्रुट मार्केट मधील गर्दी बघून कोरोना संपला की काय अशी शंका येते. या मार्केट मध्ये फळांची बोली लावताना खरेदीदारांची अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांनी मास्क घातला नाही. तर अनेकांचा मास्क तोंडाखाली आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. आतापर्यंतची सर्वांत जास्त रुग्णसंख्या गेल्या २४ तासात नोंदविल्या गेली आहे. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. दुपारीनंतर आवश्यक वस्तूंचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अशात नागरिकांची ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे. त्यामुळं इतरांसाठी नाही किमान स्वतःसाठी तरी काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस आणि महापालिकेने सुद्धा अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कळमना बाजारात खरेदीसाठी लोकांची झुंबड पोलीस आणि मनपा बघ्याच्या भूमिकेत- 15 मार्च पासून नागपूर शहरात खडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खरं पाहिलं तर ही संचारबंदी केवळ कागदावर दिसून येते,जमीन स्तरावर या संचारबंदीचा कुठेही प्रभाव दिसून आलेला नाही. गर्दीच्या ठिकाणी महानगरपालिके सह पोलिसांकडून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस आणि मनपाचे कर्मचारी केवळ बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असं वारंवार सांगितले जात आहे. मात्र नागपूरकरांच्या बेजबाबदारपणा मुळे हजारोंचे जीव पुन्हा धोक्यात येत आहेत. हे देखील नागरिकांना समजत नसल्याचं चित्र आहे.
हेही वाचा-सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली