अमरावती - कृषी केंद्र आणि खते-बियाणे वाटप करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी होऊन कोरोना संक्रमण होऊ शकतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालता यावा, यासाठी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्सी गावातील शेतकऱ्यांनी एक प्रयोग केला. या गावातील शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बाहेर गावी न जाता, थेट गावातच खते-बियाणे उपलब्ध करुन दिली आहेत.
सार्सी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत एक गट स्थापन केला. या गटामार्फत एका कंपनीसोबत संपर्क साधला. गावातील शेतकऱ्यांना गावातच खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. याअंतर्गत तब्बल 600 बॅगा खते आणि बि-बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या गावात उपलब्ध झाली. या प्रक्रियेतून शेतकऱ्यांच्या पैशाची आणि वेळेची बचत झाल्याचे पाहायला मिळाले.