महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 29, 2020, 4:36 PM IST

ETV Bharat / briefs

लातुरात अनाथ मुलीच्या माय बनल्या बचत गटाच्या महिला; लग्नखर्चासह केले कन्यादान

आज दिपालीने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात केली आहे. तिचा देवंग्रा (ता. औसा) या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला. यासाठी संसार उपयोगी लागणारे सर्व साहित्य देणे, त्यासह कन्यादान सुद्धा बचत गटाच्या महिलांनी केले.

Deepali marriage nitur
Deepali marriage nitur

लातूर- निटूर येथील दोन बचत गटांनी आज एका अनाथ मुलीचा विवाहाचा खर्च उचलून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. जीवन ज्योती ग्रामसंघ व संघर्ष महिला ग्रामसंघ अशी बचत गटांची नावे असून त्यातील महिलांनी दीपालीच्या लग्नाचा खर्चही उचलला, सोबतच तिचे कन्यादानही केले आहे.

दीपाली शिंदे (निटूर ता.निलंगा) हिचे जेमतेम अकरावी पर्यंत शिक्षण झालेले आहे. ती लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. तिला एक भाऊ आहे, मात्र तो दोन चार वर्षापासून बेपत्ता आहे. अशा आर्थिक दारिद्रयात दिपाली लहानाची मोठी झाली व तिने आकरावी पर्यंत शिक्षण घेतले. अशावेळी तिच्या चुलत आजीने तिचा सांभाळ पोटच्या लेकरा प्रमाणे केला. मात्र, तिच्या लग्नाची चिंता आजीला सतावत होती. अशातच दिपालीला देवंग्रा येथून लग्नासाठी स्थळ आले व तिचा विवाह ठरला.

सध्या लॉकडाऊन असल्या कारणाने विवाह समारंभ साधे होत आहेत. मात्र मुलीच्या विवाहाला खर्च लागेल या चिंतेने दीपालीच्या आजीने नातीचा विवाह जमला आहे त्यासाठी काही मदत करणार का, अशी विनवणी केली होती. दिपालीच्या आजीने निटूरमधीलच जीवन ज्योती ग्रामसंघ व संघर्ष महिला ग्रामसंघ अंतर्गत बचत गटांच्या महिलांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा या महिलांनी तात्काळ होकार देवून सहकार्य करण्याचे ठरवले. त्यावरून निटूरमधील बचत गटाच्या माध्यमातून काद्री लैलाबी, गोदावरी सुर्यवंशी व शालूबाई शिंदे या महिलांनी पुढाकार घेवून बचत गट व गावातील अन्य लोकांचे सहकार्य घेवून दिपालीच्या लग्नासाठी लागणारे संसार उपयोगी सर्व साहित्य 2 ते 4 दिवसामध्ये जमा केले. त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व सर्व साहित्य, तसेच 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च या महिलांनी करून सर्व साहित्य दिपालीकडे सुपूर्द केले.

त्यानंतर, आज दिपालीने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरूवात केली आहे. तिचा देवंग्रा (ता. औसा) या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला असून संसार उपयोगी लागणारे सर्व साहित्य देणे, त्यासह कन्यादान सुद्धा बचत गटाच्या महिलांनी केले. त्यामुळे बचत गटातील या महिलांचा निटूर गावात कौतूक होत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणालाही वेळ नाही. मात्र निटूरमध्ये बचत गटांनी मिळून केलेल्या कार्याचे कौतूक करावे तेवढे कमी आहे.

दिपाली शिंदे हिची आजी माझ्याकडे आली व दिपालीच्या लग्नासाठी काही तरी मदत करा, आशा म्हणाल्या. त्याच वेळी त्यांना होकार देवून बचत गटात चालणाऱ्या उमेद अभियानांतर्गत निटूरमधल्या बचत गटांना एकत्र करून आम्ही 2 ग्राम संघ व बचत गटांनी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त संसार उपयोगी साहित्य व लग्नाचा खर्च केला असल्याचे बचत गटाच्या लैलाबी काद्री यांनी सांगितले. तसेच या कामी गोदावरी सुर्यवंशी, शालूबाई शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे काद्री यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details