मुंबई- आरे कॉलनीतील 164 हेक्टर जागा इको सेन्सेटिव्ह झोन अर्थात संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यात येऊ नये, ही वनशक्ती संस्थेची याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर राज्य सरकारही या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे. तेव्हा आता सरकारलाच जागे करायचे असे म्हणत पर्यावरणप्रेमी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पर्यावरणप्रेमींनी सेव्ह आरेची मोहीम तीव्र केेली असून आरेला जंगल घोषित करावे अशी मागणीही उचलून धरली आहे. त्यासाठी सोशल मीडियावर #JusticeForAarey आणि #SaveAareyForest हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे.
आरे हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून विकासाच्या नावाखाली आरे जंगल नष्ट केले जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत. त्यातूनच 'सेव्ह आरे' ही चळवळ त्यांनी सुरू केली आहे. मात्र नवे सरकार आल्यापासून सेव्ह आरेची मोहीम थोडी थंडावली होती. तर गेल्या दोन महिन्यापासून आरेत अतिक्रमण होत असताना कोरोनामुळे पर्यावरणप्रेमी शांत होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो महत्वाची आहे असे म्हणत 165 हेक्टर जागा संवेदनशील क्षेत्रातून न वगळण्याची याचिकाच फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता आरे जंगल हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गाला लागणार आहे.