नवी दिल्ली : इस्रोच्या 'गगनयान' या महत्त्वकांक्षी मोहिमेसाठी सध्या जोमाने तयारी सुरू आहे. गगनयानच्या माध्यमातून पहिल्यांदाच भारत अंतराळात मानव पाठवणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या दोन फ्लाईट सर्जन्सना प्रशिक्षणासाठी आता रशियाला पाठवण्यात येणार आहे. रविवारी इस्रोच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
फ्लाईट सर्जन म्हणजे कोण?
अंतराळात भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे, अंतराळवीर आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पृथ्वीवरील उपचार कामी येतीलच असे नाही. त्यामुळेच एरोस्पेस मेडिसीन या शाखेतील तज्ज्ञांना अंतराळवीरांसोबत अवकाशात पाठवण्यात येते. सध्या देशाच्या हवाई दलातील एरोस्पेस मेडिसीनमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या दोन डॉक्टरांची निवड गगनयान मोहिमेसाठी करण्यात आली आहे. हे लवकरच रशियाला रवाना होतील, तसेच त्यांची प्रशिक्षणही लवकरच सुरू होईल, असे इस्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले.
फ्रान्सलाही होणार प्रशिक्षण..
रशियासोबतच, या सर्जन्सचे फ्रान्समध्येही प्रशिक्षण पार पडणार आहे. फ्रान्समध्ये स्पेस मेडिसिनची एक प्रस्थापित यंत्रणा आहे. यामध्ये एमईडीईडीएस स्पेस क्लिनिक, सीएनईएसची सहाय्यक कंपनी आहे, जिथे अवकाश सर्जन्सना प्रशिक्षण दिले जाते.
चार अंतराळवीरांचे सुरू आहे प्रशिक्षण..
देशाच्या हवाई दलातील चार टेस्ट पायलट्सची निवड गगनयानसाठी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून मॉस्कोमधील यु. ए. गागारीन रिसर्च अँड टेस्ट कॉस्मोनॉट सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. युरी गागारीन हे अवकाशात जाणारे जगातील पहिले व्यक्ती होते. त्यांच्या सन्मानार्थ या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी मानवी अंतराळ मोहिमांशी संबंधित सर्व प्रशिक्षणे, तसेच इतर अवकाश योजनांशी संबंधित बाबींवर संशोधन केले जाते.
मार्चमध्ये पूर्ण होणार प्रशिक्षण..
या चार अंतराळवीरांचे प्रशिक्षण गेल्या वर्षीच संपणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते लांबणीवर पडले. आता मार्चपर्यंत हे अंतराळवीर भारतात परत येण्याची शक्यता आहे.
इस्रोच्या गगनयान मोहिमे अंतर्गत २०२२मध्ये भारत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या मोहिमेच्या तयारीचा वेग मंदावला होता. त्यामुळे कदाचित ही मोहीम आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. मात्र, असे होऊ न देण्याकडेच इस्रोचा कल असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा :फार्मर माईंड... रिकाम्या बाटल्या, बांबूचा वापर करत पठ्ठ्यानं शेतात पोहचवलं पाणी