नवी दिल्ली -राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. बुधवारी शिरोमणी अकाली दलने भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी ही घोषणा केली.
भाजपसोबतचे आमची युती ही राजकीय नसून भावनीक आहे. देश आणि पंजाबच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते भाजपसाठी काम करतील. नागरिकत्व सुधारणा कायद्याला आमचा पाठिंबा आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याची आम्ही नेहमची मागणी केली होती, असे शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंह म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नाते खुप जुने आणि मजबूत आहे. जेव्हा देशाला गरज असते. तेव्हा अकाली दल नेहमीच पुढाकार घेतो, असे नड्डा म्हणाले. दरम्यान एनआरसीवर भाजप जोपर्यंत भूमिका घेत नाही. तोपर्यंत आम्ही भाजपसोबत जाणार नाही, अशी भूमिका अकाली दलाने घेतली होती. तेव्हा दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही, असे निश्चित केले होते. शिरोमणी अकाली दलाची मागील 21 वर्षांपासून भाजपसोबत युती आहे.