कानपूर - कुख्यात गुंड विकास दुबेला आज सकाळी (शुक्रवारी) उज्जैन येथून कानपूर येथे आणण्यात येत असताना एसटीएफच्या (स्पेशल टास्क फोर्स) या गाडीला अपघात झाला. यावेळी गुंड विकास दुबेने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये तो ठार झाला. दुबेच्या एन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, विकास दुबेचे एन्काउंटर होण्याआधी पोलिसांनी एसटीएफ टीमला फॉलो करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना थांबवले होते. यावरुन देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याबाबत म्हणाले, 'दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है', असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, 'अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?' असे म्हणत यानंतर आता पुढे काय होणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.