धर्मशाला - कारगिल युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल युद्धामध्ये सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्यांनी कैद करत अत्यंत वाईट वागणूक देत त्यांची हत्या केली होती. सौरभ यांच्या वडिलांना घटनेच्या 20 वर्षानंतर तरी आपल्या मुलाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लघंन करत पाकिस्तानने सौरभ यांना शारिरीक यातना दिल्या होत्या. सौरभ आणि त्यांच्या साथीदारांना न्याय मिळेल, अशी आशा कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सौरभ यांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 'मी त्या सर्व सैनिकांचे आभार मानतो जे आपल्या देशाची मान उंचवतात. कठीण परिस्थितीमध्ये काम करून देशाला सुरक्षित ठेवणे ही मोठी गोष्ट आहे. भारत देश बदलला असून पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवाईवर सडेतोड उत्तर मिळत आहे. सैनिकांना कारवाई करण्याची सूट मिळाल्यामुळे आंतकवादी घडामोडींमध्ये घट झाली आहे', असे ते म्हणाले.