सांगली - ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून १७ तारखेनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात येईल. रेड झोन वगळता बाकी जिल्ह्यातील छोटे-छोटे उद्योग सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची, माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
कोरोना लॉकडाऊन लावताना केंद्र शासनाने अगोदर 48 तासांचा अवधी दिला असता तर देशभरातील सर्वसामान्य जनता आपल्या स्वगृही सुखरूप पोहोचली असती. कष्टकरी कामगारांची होरपळ झाली नसती. मात्र, आता जीवाची पर्वा न करता हे लोक गावी परत येत आहेत. आरोग्य, पोलीस यंत्रणा सतर्क आहेच मात्र, गाव पातळीवर काम करणाऱया ग्राम समितीनेही विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.
डॉ. कदम हे शुक्रवारी जत तालुक्याच्या दौर्यावर आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पंचायत समितीमध्ये त्यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, तहसिलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर उपस्थित होते.