भीमाशंकर (पुणे) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू असलेल्या नुतनीकरणाच्या कामांमुळे भीमानदी उगमाचा प्रवाह बंद झाला होता. या बंद झालेल्या प्रवाहामुळे पावसाचे पाणी हे थेट मंदिरात गाभाऱ्यात जाऊन शिवलिंग पाण्याखाली गेले होते. याच दरम्यान ईटीव्ही बातमी दाखविल्यानंतर पुरातन आणि महसूल विभाग खडबडून जागे होत शुक्रवारी भीमाशंकर मंदिर परिसरात पहाणी केली. या परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या काही त्रुटींमुळे पावसाचे पाणी हे मंदिरात गेले.
पुढील 24 तासांत कामाची दुरुस्ती करून पाण्याची वाट मोकळी केली जाईल, असे तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी ईटीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर येथील शिवलिंग हे पाण्याखाली गेल्याची घटना घडली आहे.
स्थानिकांचा आरोप -
भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिर परिसरात सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी होती. मात्र, ही कामे वेळेत न झाल्याने ही घटना घडली. आता प्रशासनाने ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी मुख्य पुजारी मधुकर गवांदे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार यांनी केली आहे. तर या परिसरात विकासकामे करत असताना भीमा नदीचा प्रवाह बदलण्याची गरज नव्हती, असा आरोपही त्यांनी केला आहे.