नाशिक - दारणाकाठच्या शिवारात जुलै महिन्यात तब्बल 9 बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र अजुनही या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे दिसून आले आहे. भगूर- राहुरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. त्यामुळे आता दिवसासुद्धा शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
भगूर राहुरी शिवारातील संतोष रामदास सानप यांच्या मालकी गट क्रमांक ३९ मध्ये बिबटया मुक्त संचार करत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या हालचाली काही शेतकऱयांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केल्या असून दिवसासुद्धा बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामांना जातांना जोखीम पत्करावी लागत आहे. याच ठिकाणी वनविभागाने पिंजरा सुद्धा लावला आहे.
सध्या शेती कामाचे दिवस आहेत. मात्र बिबट्याचा मुक्त वावर असल्याने कधी हा बिबट्या जेरबंद होईल, याकडे स्थनिक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दारणा नदीकाठ बनला बिबट्यांचा हॉटस्पॉट
नाशिकचा दारणानदी काठ बिबट्यांचा हॉटस्पॉट बनला असून जुलै महिन्यात तब्बल 9 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. यात 5 मादी तर 4 नर बिबट्यांचा समावेश आहे. अजून ही काही बिबट्यांचा या भागात वावर असल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांचा बळी गेला असून दोन जण जखमी झाले आहेत. या बाबत 12 पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्यांचा वावर असलेल्या भागात 10 ते 12 सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.