नंदुरबार - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार गांभीर्याने घेवू नका, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही, पण वाघ वाघच असतो, आम्ही पिंजऱ्याचे दार उघडे ठेवले आहे. हिंमत्त असले तर त्यांनी पिंजऱ्याच्या आत येवून वाघाच्या मिशांना हात लावून दाखवावा, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये वीज वाहिनीच्या धक्क्याने दोन बालिकांसह तीन शेळ्या ठार
काल पाटील यांचा वाढदिवस होता, त्यांनी काल केक जास्त खाल्ला असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. तर, प्रशांत किशोर हे राजकीय आखणीकार असून काही माहिती समजून घेण्यासाठी किंवा काही सर्वेक्षण करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत त्यांची बैठक होत असेल तर आपण त्यात जास्त लक्ष घालण्याची गरज नसल्याचे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हंटले.
काँग्रेस पक्षाने संघटना मजबूत केली पाहिजे
काँग्रेस हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष असून त्यांचे अनेक तरुण नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यांनी संघटना मजबूत केली पाहिजे, कारण विरोधी पक्ष हा लोकशाहीसाठी अधिक मजबूत हवा, हे आपण काँग्रेसबाबत म्हंटले असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
राज्यातील सरकार पाच वर्षे चालेल
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर काही वेगवाण घडामोडी नसतात. राज्यातले अनेक महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात राज शिष्टाचारानुरूप मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण संदर्भात राज्याची काही भुमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच या संदर्भात काही भूमिका घ्यावी लागेल. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. ज्या ताकदीने काँग्रेस नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी पाडवी हे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संघर्ष करतात, त्यापेक्षा त्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात संघर्ष करावा, आम्ही त्यांना साथ देवू, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी त्यांच्या कामकाज शैलीवर नाराज असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. आज खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
हेही वाचा - पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीविरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेसचे आंदोलन