मुंबई - मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजात संतापाची ठिणगी पेटली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मुंबईत 20 ते 25 विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. घाटकोपर, पंतनगर येथील मराठी विद्यालय येथे तर, पवई आय.आय.टी मेन गेट, भांडुपचा शिवाजी तलाव परिसर, मुलुंड, विक्रोळीत कन्नमवार नगर, चेंबूर आदी ठिकाणी मराठा बांधवांनी हे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन करत तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर केला.
आंदोलनादरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी जागृत झाला आहे. याआधीच्या आंदोलनाने आम्ही आमची ताकद व एकता दाखवून दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगिती विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच आम्ही आरक्षण घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही. आरक्षणासाठी आम्ही राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सरकारला दिला.