मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांसमोर अडचणी उभ्या करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा प्रकार अद्यापही सुरूच आहे. या परीक्षेसाठी सुरू असलेल्या यंत्रणेमध्ये रोज वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असतानाच आज विद्यापीठाचा एक पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाची लिंक ओपन होण्यापासून ते पेपर डाऊनलोड करण्यापर्यंत अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच दोन दिवसांपूर्वी पेपर डाऊनलोड न झाल्याने कित्येक विद्यार्थी परीक्षेला मुकले होते. विद्यार्थ्यांच्या रोषानंतर 9 आणि 14 ऑक्टोबरला परीक्षा घेत असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
सोमवारी या परीक्षेसाठी 73 हजार 314 विद्यार्थी परीक्षेला बसले होते; त्यापैकी 71 हजार 729 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर, उर्वरित दोन हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. अशातच आज पुन्हा तांत्रिक अडचणी आल्याने आज शेकडो विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे विद्यापीठाला आज अखेर टीवायबी कॉम चा पेपर पुढे ढकलावा लागला आहे. त्यासाठीची सुधारित तारीख विद्यापीठाकडून नंतर जाहीर केली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांकडून सांगण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये 3 ऑक्टोबरपासून तृतीय वर्षाच्या परीक्षेला सुरुवात झाली होती. यामध्ये बीए, बीकॉम, बीएसस्सी आयटी सत्र 6 व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स या शाखांचे पेपर होते. मात्र पेपर सुरू होताच विद्यार्थ्यांना डाऊनलोड आणि इतर अडचणी आल्यामुळे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले होते. यासंदर्भात विद्यापीठाने अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही यावर तोडगा काढण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही.