मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असतानादेखील मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन उद्योजक वाधवा आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांना परवानगी कशी मिळाली याची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे कोणालाही प्रवास करण्याची परवानगी नाही. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच पोलिसांकडून परवानगी देण्यात येते, असेही देखमुख यांनी सांगितले. मुंबईतील मोठे व्यापारी वाधवा कुटुंबीय आणि कर्मचारी असे २३ जण लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. महाबळेश्वरमधील नागरिकांनी त्यांना आपल्या फार्महाऊसवर थांबण्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने त्यांना पाचगणीमध्ये उभारलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले.