मुंबई - पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. पाचही राज्यांच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती येऊ लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप ममता बॅनर्जींना टक्कर देत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही, असे भाकीत राऊत यांनी केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत -
पुद्दुचेरी आणि तामिळनाडू सोडून कुठेही परिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीच सत्तेच येणार आहेत. त्यांना हरवणे शक्य नाही. मात्र, भाजपने केलेल्या मेहनतीची कौतुक केले पाहिजे. कोरोनाच्या संकट काळात मोदी आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री बंगालमध्ये बसले होते, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लावला आहे. भाजपचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल हाती येतील, तेव्हा तृणमूल काँग्रेसचे सरकार तिथे असेल, असे राऊत म्हणाले.
निवडणुकीचे नियोजन केले पण गर्दी नियंत्रणात आणली नाही -
निवडणुकीचे हे वातावरण दुपारपर्यंत संपून जाईल. देशभरात आजही सर्वात मोठे संकट हे करोनाचेच आहे. आम्हाला राजकीय आकड्यांपेक्षा कोरोना बाधितांच्या संख्येची चिंता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि मद्रास न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, देशात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणुकीचे नियोजन केले मात्र, गर्दी नियंत्रणात आणली नाही. त्यासाठी आपण किंमत मोजतो आहोत. देशात ४ लाखांच्यावर रुग्ण वाढले आहेत, असे राऊत म्हणाले.