चंद्रपूर - दिवाळीसाठी पुणे येथून चंद्रपूर-बल्लारपूर येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सुरू केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, या रेल्वेच्या नावावर ग्राहकांची लूट केली जात आहे. साधारण भाड्याच्या तुलनेत तब्बल चारपट रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जात आहे. यावर पुणेवरून येणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर आणि नजीकच्या जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच अनेक कुटुंब पुणे येथे राहतात. दिवाळीच्या वेळी हे लोक परत आपल्या घरी येतात. मात्र, त्यांना येण्यासाठी वाहतुकीची पुरेशी सुविधा नसते. अशावेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होते. यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीने पुणे-बल्लारपूर ही विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याने या ट्रेनला मंजुरी मिळाली. 82123 क्रमांकाची रेल्वे पुणे येथून 25 ऑक्टोबरला रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी बल्लारपूरकडे रवाना झाली. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 ऑक्टोबरला 6 वाजून 10 मिनिटांनी बल्लारपूर येथे पोहोचली. मात्र, या रेल्वेचे भाडे अवाच्यासव्वा वसूल करण्यात येत आहे. आधीच सुरू असलेल्या पूणे काझीपेठ या रेल्वेच्या स्लीपर कोचची तिकीट 475 रुपये एवढी आहे. तर हीच तिकीट सुविधा स्पेशल या रेल्वेची 1 हजार 697 रु आहे. एसी तिकीट सुद्धा चारपट महाग आहे. सुविधेच्या नावावर प्रवाशांची लूट केली जात आहे. यावर पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.