चंद्रपूर- जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा या गावाला जोडणारा पूल पूरामुळे क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नाल्यातील पुरात आठवडाभरात तीस पाळीव जनावरे वाहून गेली आहेत. मात्र, गावातील शेतकऱ्यांचा नाईलाज असल्याने हा जीवघेणा प्रवास अद्यापही सुरू आहे.
सोमणपल्ली- कोंढाणा या दोन गावांच्या मार्गातून मोठा नाला वाहतो. साधारणतः दहा वर्षांपूर्वी या नाल्यावर पुलाची निर्मिती झाली. मात्र पहिल्याच पावसात पुलाचा बराच भाग वाहून गेला. तेव्हापासून पुलाच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली. मात्र प्रशासनाने बांधकाम केले नाही. परिणामी अवघ्या आठवडाभरात या नाल्याने तीस जनावरे गिळंकृत केली.
सोमनपल्ली येथील शेतकऱ्यांची जमीन कोंढाणा परिसरात आहे. गावातील जनावरांना चराईसाठी नाइलाजाने नाल्यातील पुराच्या पाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागते. यावेळी जनावरे वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. याप्रकाराने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे लोकांना तीच कसरत करावी लागत आहे. गुरेही पूर पार करून पलीकडे जात आहेत. कोंढाणा येथील विद्यार्थ्यांची शाळा बंदच आहे. पूर असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे कोंढाणा-सोमनपल्ली पूल तातडीने बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.