बीड- जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर चक्क ८ दिवसापासून शेतकरी रांगा लावून बसले आहेत. यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नाही आणि दुसरीकडे आमची हेळसांड होत आहे, अशा प्रतिक्रिया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिल्या आहेत.
मंगळवारी शहरातील एस.आर. कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या कापसाची वाहणे मागील ८ दिवसापासून नंबरला लागलेली आहेत. मात्र, कापसाचे माप होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, आठवड्यातील दोन ते तीन दिवस शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कापसाची गुणवत्ता घसरलेली असल्याचे सांगत प्रति क्विंटलमागे दोनशे-तीनशे रुपये कमी भाव दिला जात आहे.
शासनाचा भाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. मात्र, कापसात गुणवत्ता नाही असे सांगून प्रति क्विंटल ५ हजार ३२५ रुपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांच्या कापसाला दिला जात आहे. मागील कित्येक दिवसांपासून कापसाचे माप होत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील धारूर येथील एका शेतकऱ्याने कापसाचे माप होत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नाकडे जर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा- परळीत व्यापाऱ्याला मारहाण, धनंजय मुंडे म्हणाले...