अहमदनगर- नवीन तंत्रज्ञान युक्त असलेल्या कपाशीच्या एचटीबीटी (जनुकीय सुधारित) या कापसाच्या वाणाच्या लागवडीसाठी राज्य सरकारने बंदी घातलेलेली आहे. मात्र, तरीही श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सरकारच्या आदेशाचे भंग करत या वाणाची लागवड करत आहेत. या वाणाला गुलाबी बोंड अळी येत नाही. त्यामुळे कीटक नाशक फवारणीचा मोठा खर्च वाचतो. तसेच शेतकऱ्यांना यात राऊंडअप सारखे तणनाशकही वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खुरपणीच्या खर्चातही बचत होते, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेले तंत्रज्ञान सरकार किटकनाशक कंपन्या आणि पर्यावरणवादी संघटना यांच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांना नाकारत आहे. मात्र, शेतकरी संघटननेने (शरद जोशी प्रणित) हे प्रतिबंधित बियाणे लागवड करुन सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी हे सविनय कायदे भंग आंदोलन सुरू केले असल्याचे शेतकरी सांगतात.
आम्हाला आमच्या पिकाचे स्वातंत्र हवे असून गुजरात, आंध्रप्रदेश अशा अन्य राज्यातील शेतकऱ्यांना तेथील राज्य सरकारने या बीयाणाची पेरणी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आपले सरकार परवानगी देत नाही. म्हणून आम्ही 'होय गुन्हेगार' हे आंदोलन करत पेरणी केली असल्याचे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष निलेश शेंडगे यांनी सांगितले.
एचटीबीटी या कापसाच्या वाणाच्या विक्री, साठेबाजी आणि लागवड करण्यास मनाई आहे. कायद्यात तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, तरीही शेतकरी या बीयांनाची लागवड करत आहेत. जिल्हा प्रशासनाने या बाबत अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.