लोकमान्य टिळकांनी पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून मोठ्या उत्साहात शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. संपूर्ण जगभरातून पुणे शहरातील गणेशोत्सव पाहिला जातो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील या गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे. पुणे शहरात मानाचे पाच आणि त्या व्यतिरिक्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बाबू गेनू गणपती, मंडई गणपती हे गणपती देखील नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात. पुण्यासह राज्यातल्या इतर शहरातही अनेक नागरिक गणेशोत्सव काळात या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. काळानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप बदलत गेले तरीही पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचे महत्व मात्र आजही टिकून आहे. जाणून घेऊया पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी
![Ganpati is the first kasba of Mana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16194719_---.jpg)
मानाचा पहिला कसबा गणपती कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा गणपतीचे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे असे म्हटले जाते. शहराच्या मध्यवस्तीत आणि शनिवारवाड्याच्या जवळच कसबा गणपतीचे मंदिर आहे. कसबा गणेशाची मूर्ती स्वयंभू असून, ती साडेतीन फूट उंचीची आहे. शहाजीराजांनी जेव्हा लाल महाल बांधला त्याचवेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले होते. 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा गणपती मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जातो. या गणपतीपासूनच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
![Another Tambadi Jogeshwari Ganpati of Mana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16194719_----.jpg)
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती कसबा गणपतीप्रमाणे तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सवाला आ 1893 पासूनच सुरुवात झाली. तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. ग्रामदैवतेच्या नावाने हा गणपती ओळखला जातो. या गणपतीचे मंदिर देखील पुरातन असून, या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. या गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि पुन्हा नव्याने मूर्तीची स्थापना करण्यात येते. अप्पा बळवंत चौकात असलेल्या उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी 1893 साली सुरुवात केली.
![Another Tambadi Jogeshwari Ganpati of Mana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16194719_----.jpg)
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती ओळखला जातो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्याआधी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला आहे.
![Manache 5 Ganpati In Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16194719_----.jpg)
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाला सुरुवात केली. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची आहे. उत्कृष्ट देखाव्यासाठी देखील हा गणपती प्रसिद्ध आहे.
![Fourth Tulshibag Ganesha of Mana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16194719_----new.jpg)
मानाचा पाचवा गणपती केसरी गणपती पुण्यातील शेवटचा आणि मानाचा पाचवा गणपती म्हणून केसरी वाड्यातला गणपती ओळखला जातो. 1905 पासून टिळक वाड्यात या गणपतीचा उत्सव होण्यास सुरुवात झाली. मानाच्या पाचव्या गणपती उत्सवात लोकमान्य टिळकांचे व्याख्यान होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरून जाते. मात्र, केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरून जाऊन विसर्जित होतो.
हेही वाचा History and Culture लालबागचा गणपती का आहे महत्त्वाचा, जाणून घ्या त्यामागची कथा