मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संशोधन केलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र काँग्रेसवर सडकून टीका करताना कोरोना काळात संसर्ग वाढवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप केला. काँग्रेस नेत्यांनी सर्व आरोपांचे खंडन करत, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्ला चढवला.
मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, की शरद पवार यांचे काम स्तुती करण्यासारखे आहे. परंतु, मोदींना काँग्रेसची भीती आहे. त्यामुळेच काँग्रेसवर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कोरोना काळात केलेल्या पापांचा शाप भाजपला येत्या निवडणुकात भोगावा लागणार असे वडेट्टीवार म्हणाले. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला आहे. महाराष्ट्रातून कोरोना पसरल्याचा जो आरोप पंतप्रधानांनी संसदेत केला. त्याऐवजी राजकीय भाषणातून त्यांना टिका करता आली असती. मात्र संसदेचा असा वापर करणे योग्य नाही.
विमानसेवा बंद केली असती तर संसर्ग वाढला नसता
विदेशातून कोरोना आला. पहिला रुग्ण सापडल्यानंतर ट्रम्प यांचा कार्यक्रम गुजरातला झाला. त्यावेळी खचाखच गर्दी होती. लॉकडाउननंतर करू, पण कार्यक्रम झालाच पाहिजे यावर मोदींनी भर दिला होता. त्यामुळे ट्रम्प यांच्या माध्यमातून देशात कोरोना फैलावला. विदेशातून कोरोनाचा प्रसार झाला. वेळीच विमानसेवा बंद केली असती तर संसर्ग वाढला नसता, असेही वडेट्टीवार म्हणाले. कोरोनाची भीती व्यक्त केली जात असताना, हरिद्वार येथे कुंभमेळा झाला. सुरुवातीपासून लाख ते सव्वा लाख लोक उपस्थित राहत होते. पहिल्याच दिवशी 93 लाख लोक तेथे होते. हा खेळ कोणासाठी सुरू होता? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित करत मोदींवर सडकून टीका केली.
हेही वाचा-Hindustani Bhau : वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळला
घरी पोहोचवण्यासाठी 93 कोटी रुपये खर्च-
कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक मिळेल त्या मार्गाने, वाहनाने मूळ गाव गाठू लागले. अनेक लोक ट्रेनच्या पटरी वरती चालत असताना अनेकांचा जीवही गेला. महाराष्ट्रातून जी लोक गेली, त्यांना त्या राज्यात घेतले जात नव्हते. मात्र घाबरलेल्या लोकांना सुरक्षित स्थितीत मूळ गावापर्यंत पोहचवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. गावी पाठवत असताना त्याची वैद्यकीय तपासणी आम्ही केली. त्यानंतरच आम्ही त्यांना पाठविल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तसेच लोकांना घरी पोहोचवण्यासाठी आम्ही 93 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. राजकीय सुड आणि द्वेषापोटी मोदी आरोप करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील लोकांशी द्वेषाने वागू नका
कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवण्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, आम्ही कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. उलट गुजरातने आकडेवारी लपवली. गुजरातमध्ये 10 हजार मृत्यु दाखवले. 82 हजार लोकांना मदत देण्यात आली. याचा अर्थ आकडा मोठ्या प्रमाणात लपवले गेले. भाजप आणि मोदी काँग्रेसवर आरोप करून मतांचा जोगवा मागत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील लोकांशी द्वेषाने वागू नका, असे आवाहन केले.
गिरे तो भी टांग उपर, अशी भाजपची स्थिती
मोदींनी संसदेत शरद पवार यांचे कौतुक केले. पवार प्रेरणा देत असून काँग्रेसने त्यांच्याकडून शिकावे, असा टोला लगावला. वडेट्टीवार यांनी याला प्रत्युत्तर दिले. पवारांचे कौतुक करण्यासारखे काम आहे. मात्र ते काँग्रेसवर आरोप करत आहेत. त्यांना काँग्रेसचे भीती आहे. काँग्रेस हा पक्ष नाही, विचार आहे असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार हा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे मोदींना बोलण्याचा अधिकार नाही. असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. किरीट सोमैय्या यांचाही यावेळी समाचार घेतला. गिरे तो भी टांग उपर, अशी भाजपची स्थिती आहे. या सर्व प्रकारचे व्हिडीओ समोर आहेत. त्यामुळे किरीट सोमैय्यांना कोणी पाडले हे त्यात स्पष्ट आहे. राज्यातील आघाडी सरकारला जेवढे बदनाम करता येईल, यावर त्यांचा भर असतो असेही वडेट्टीवार म्हणाले
भाजपला निवडणुकीमधून उत्तर मिळेल-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे वक्तव्य ( Vijay Wadettiwar slammed PM Modi ) केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला दोषी ठरवले आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. यूपीमध्ये भाजप उमेदवारांना हाकलून ( citizens rejecting BJP in UP ) लावले जात आहेत. गंगेत मृतदेह टाकताना तुम्ही कुठे होतात. भाजपने पळ काढून काँग्रेसवर रचलेला कुंभाड ( BJP blaming congress ) आहे. आगामी पाच राज्यांतील निवडणुकीत भाजपला याचे उत्तर मिळेल, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ( Vijay Wadettiwar slammed BJP ) लगावला आहे.