ठाणे - भिवंडीतील अंबाडी नाका येथील श्रमजीवी कार्यालयात 'माणुसकीची थाळी' हा उपक्रम सोशल डिस्टनसिंग पाळून सुरू करण्यात आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या, रेशनकार्ड नसलेल्या भुकेल्या बांधवांना दिलासा देण्यासाठी श्रमजीवीने हा उपक्रम सुरू केलाय. गणेशपुरीचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'माणुसकीच्या थाळी'चा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 200 गरजूंनी या थाळीचा लाभ घेतला आहे. 150 ते 200 माणसांना दुपारी आणि संध्याकाळी जेवण देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊन नंतर अनेक गरीब कुटुंबांच्या जेवणाचे हाल झाले. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांची परिस्थीती आणखी बिकट झाली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या प्रेरणेने, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांच्या संकल्पनेतून आज अंबाडी नाक्यावर हा उपक्रम राबवण्यात आलाय. भिवंडी-वाडा, शिरसाड-अंबाडी आणि दाभाड-अंबाडी मार्गावरून चालत येणाऱ्या शेकडो कामगारांना भोजन, पाणी, वाहन आणि सुरक्षित स्थळी त्यांची राहण्याची सोय पुरवण्यात आली आहे.
दरम्यान, विविध दात्यांच्या मदतीने साहित्य गोळा करून तब्बल 1000 कुटुंबाना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू देऊन दिलासा दिला आहे. तर आजपासून 150 ते 200 लोकांचे जेवण मोफत देण्यासाठी माणुसकीची थाळी सुरू केल्याचे श्रमजीवी संघटने प्रमोद पवार यांनी सांगितले. या मोहिमेत पवार यांच्यासोबत नारायण जोशी, जयेंद्र गावित, जयेश पाटील, नवनाथ भोये, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश जाधव, श्रमजीवी टॅक्सी युनियनचे भूषण जाधव व अन्य नागरिकांनी मोलाची साथ दिल्याचे ते म्हणाले.