औरंगाबाद - संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथील कर्मवीर श्री शंकर सिंग नाईक हायस्कूल मधील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची रांगोळी काढून आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.
संपूर्ण जगात पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे आणि म्हणूनच 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये या उपक्रमाची नोंद घेतली गेली आहे. वेगळा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. असा दावा राजेश निंबाळकर यांनी केला आहे.
ही रांगोळी काढण्यासाठी आपल्या हाताच्या तळव्या एवढ्या पिंपळाच्या पानावर ही रांगोळी रेखाटली गेली. तीन तासाचा अवधी लागला असून 35 ग्राम रांगोळीचा उपयोग रांगोळी रेखाटण्यासाठी करण्यात आला. सध्या संपूर्ण जगभर कोरोना सारख्या महामारीचे सावट असताना आणि संपूर्ण विश्व हे या महामारीत दुःखमय झालेले असताना या दुःखातून सावरण्यासाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान हेच निश्चित उपयोगाला येईल आणि म्हणूनच ज्या बोधीवृक्षाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. अशा पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटून एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती राजेश निंबेकर यांनी दिली.
यापूर्वी देखील विविध महामानवांचे फलक लेखन पोट्रेट आणि रांगोळी काढून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले आहेत तसेच अनेक सामाजिक आणि ज्वलंत विषयावर देखील रांगोळीचे रेखाटने केली आहेत. नुकत्याच त्यांच्या रांगोळी कलेची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यासंदर्भात सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अशी माहिती राजेश निंबेकर यांनी दिली.